Wednesday, October 24, 2018

किल्ला

          ऑक्टोबर चा महिना आला म्हणजे हवेत एक वेगळा असा मंद गारवा आणि गंध पसरलेला असतो. माहीत नाही, कदाचित मी एकटाच असेन ज्याला हा गंध जाणवत असेल, पण तो गंध हवा हवासा वाटतो. शरद ऋतू ची चाहूल म्हणा किंवा वेगळं काही खूप मनमोहक असं सगळं वातावरण असतं. याच काळात माझे आवडते सगळे सण वार येतात. दसरा, कोजागिरी, आणि सणांचा राजा म्हणता येईल असा दिवाळी चा सण. हल्ली पूर्वीसारखं राहिलं नाही हे खरंय पण जग कितीही बदललं तरी हा काळ तसाच हवाहवास वाटतोच. हल्ली दिवाळी जवळ आली की फार तर फार जरा साफसफाई करू किंवा काहीतरी नवीन कपडे घेऊन काम मोकळं करू. कदाचित मोठे झाल्याचे side effects असावे. आजकाल फटाके उडवताना सुद्धा विचार करतो, खरंच गरज आहे का वगैरे वगैरे. पण एक काळ होता 90 दशकातला, जेव्हा गोष्टी अतिशय वेगळ्या होत्या. दिवाळी ची लगबग म्हणजे बाप रे बाप. शाळेचा तो शेवटचा दिवस(दिवाळी सुट्टी च्या आधीचा) झाला रे झाला की plans ची आखणी सुरू. काय करू आणि काय नाही अशी गत. घरी आई बाबांची गडबड असायची की साफसफाई करावी, त्यात आम्ही म्हणजे जणू कमी वेतन वर असलेले मजूर. ओढून काम करून घेणार, पण त्यात मजा यायची. अश्याच लगबगीत आमच्यापुढे, (म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ) एक monumental task असायचं. ते म्हणजे किल्ला बांधायचं. किल्ला म्हणलं की सर्व दिवाळीच्या plans मधला महत्वाचा प्लॅन असायचा.

           सुरुवात व्हायची अंगण साफ करण्यापासून. आता बाकीचं काही साफ होवो ना होवो, अंगण मात्र साफ झालाच पाहिजे, कारण ते आमचं भूमिपूजन असायचं. आता ते झाल्यावर सगळी सामुग्री तर आणायला पाहिजे. मग बाबा मी आणि कार्तिक(माझा लहान भाऊ) मागे ओढ्यात(घराच्या मागील बाजूस ओढा होता) जाऊन दगड आणि माती आणायचो. आता त्यावरून अनेक conflict व्हायचे. "एवढे बास झाले की", असं आई आणि बाबा दोघांकडून ऐकायला मिळायचे. पण छे, ' सस्ती चीजों का शौक हम नाहीं रखते'. अपेक्षेपेक्षा जास्त दगड आणि माती आणलीच जायची. बरं ते काम काही सोप्पं न्हवत. साधारण एक 100 मिटर अंतर असावं. तेवढं अंतर कापत एक एक करून दगड आणायचा. माती साठी ठरलेलं एक पोतं असायचाच. त्याचे एक दोन खेप झाले की माती पुरायची.

            हे एक काम झालं. आता साधारण दिवाळी च्या आधीच्या रविवारचा मुहूर्त ठरायचा आणि किल्ला बांधणी ला सुरुवात व्हायची. बाबा सगळे जड असलेले दगड बरोबर पायाशी लावत रचत जायचे. आता त्यात मी chief architect प्रमाणे "गुहा इथे पाहिजे, इथे एक गुप्त मार्ग हवा, इथे 4 बुरुज हवे आणि इथे खाली गाव हवं" असे आदेश देत काम नीट चालू आहे ना बघायचो. कडा वगैरे माझं डोमेन होतं. ते मीच करायचो. आई म्हणायची "अरे एवढे कष्ट कशाला, सरळ 4 दगड टाका आणि त्यावर पोत टाकून काम माती थोपून किल्ला करा". पण तेच की , असली पळवाट बिलकुल आवडायची नाही. पोत टाकला की मग झाडं उगवण्याचा प्रश्न यायचा आणि किल्ला फारच कृत्रिम दिसायचा. हळू हळू किल्ला shape घ्यायचा आणि मग आवडीचे काम सुरू व्हायचे, ते म्हणजे चिखल काम. सगळं अंगण भरून चिखल करायचा आणि तो बरोबर दगडांवर थोपुन मातीचा एक जाडसर layer तयार करायचा. वर शिवाजी महाराजांसाठी शामियाना आणि मग त्याला जोडून पायऱ्या आणि तटबंदी हाताने करायची. बुरुज वगैरे यांना shape देऊन झालं की खराट्याच्या कड्यानी पायऱ्यावर रेलिंग तयार करायचं. किल्ल्याच्या पायथ्याशी गाव असायचं आणि त्या साठी कोरडी मातीचा थर टाकून गाव ready करायचं. किल्ला ओला असतानाच त्यावर मोहरी किंवा हळीवाचे दाणे टाकायचे जेणेकरून बरोबर दिवाळीच्या दरम्यान जंगल तयार व्हावं. हे हळीव नावाचं पण काहीतरी असतं ते मला तेव्हा कळलं होतं. 

          आता अजून एक महत्वाचं काम असायचं म्हणजे मातीची चित्र आणायची (माझ्याकडे अजून आहेत). दर वर्षी काही नवीन आणलीच पाहिजे असा अलिखित नियम होता. ढाल तलवार असलेले मावळे, गावकरी, वाघ सिंह, हत्ती एखादा क्रूर सिंग असली चित्र आणायची. आणताना नवजात बालकाला जपू अशी जपून आणायची. चुकून टवका उडाला म्हणजे जीव खाली वर व्हायचा.  वसुबारस आल्यावर आकाश कंदील लावायचा आणि चित्र लावायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हायचा. वर शामियान्याच्या चौथाऱ्यावर फुलं टाकली म्हणजे अभिषेक झाला. त्यावर शिवाजी महाराजांचं चित्र ठेवायचं. मग थोडा दरबाराचा feel देण्यासाठी त्या चौथाऱ्याच्या छोट्याश्या जागेत 5 चित्र वगैरे ठेवायची. मग हळू हळू बाकीची चित्र त्यांच्या बाकीच्या जागेवर ठेवायची. क्रूर सिंग आणि एखाद्या मावळ्याची लढाईचा सीन दाखवायचा. कुंकू ओल करून क्रूर सिंगच्या छातीवर दाखवायचं. एखादा चित्रपटाचा सेट शोभेल असा रुबाब असायचा. सिंह आणि वाघ आपल्या आपल्या गुहेत जायचे आणि नेमके त्यांच्या समोर हरीण गवत खात राहायचं. गावात, विहीर, फेरीवाले, भाजीवाले, वगैरे त्यांच्या जागेवर ठेवायचे. बरं, आता त्या भाजी वाल्या बाई ची जागा कुठे असेल , त्याची मार्केटिंग strategy बनवायची. जेणेकरून तिच्या भाज्यांचा जास्त खप होईल. जिथे जास्त चित्र असतील तिथे बरोबर तिला ठेवायचं. शेजारी कुस्ती खेळणारे ठेवायचे जेणेकरून तिला बोर नाही होणार. गावाच्या वेशीवर रांगोळी काढायची आणि सगळं अंगण झाडून किल्ल्याचं inauguration करायचं.



              आता त्या किल्ल्यावर पणत्या ठेवायच्या, गुहेत पण ठेवायच्या जे एकरून गुहेला एक गूढ आणि सस्पेन्स फील यावा.दिवाळी मध्ये दररोज किमान 2 वेळा ना चुकता किल्ल्यावर पाणी शिम्पडायचे जेणेकरून जंगल हिरवागार राहावं. नरकचतूर्दशीच्या दिवशी पहाटे उठून, अंघोळ करून, area मधला पहिला फटका वाजवायचा मान पटकावून किल्ल्यावर पणत्या लावायच्या आणि मग रांगोळी काढायची. हे असं तुळशीच्या लग्नापर्यंत चालायचं. तुळशीचं लग्न झालं की मग मनावर दगड ठेऊन कठोर निर्णय घ्यायची वेळ यायची. ती म्हणजे किल्ला dismantle करणे. त्यासाठी पण वेगळा प्लॅन असायचा. आता ते सहजा सहजी करता आलं असतं. शांतपणे माती काढून दगड एक एक करून काढून आपला प्रेमाने तो किल्ला मोकळा करायचा. पण छे. असं कसं चालेल. त्या किल्ल्यावर कोणीतरी घात करुन बॉम्ब लावला असा scene करायचा. एक छानसा टपोरा सुतळी किंवा चौकोनी बॉम्ब प्रत्येक गुहेत लावायचा. त्याने फार काही नुकसान व्हायचं नाही पण तेवढाच आपला फील. मनसोक्त बॉम्ब लावून झाले की मग finally हाताने सगळी माती बाजूला करून दगड आपले परत ओढ्याच्या किनारी ठेऊन अंगण पुन्हा चांगलं पाण्याने धुवून back to normal करायचे.

     आज मी जेव्हा रस्त्यावर बघतो, सगळं अगदी ready-made मिळतं हो. तुम्हाला काहीच करायचं नाही. अत्यंत सुबक आणि कलाकुसर असलेले तयार किल्ले मिळतील. चित्र पण fixed मिळतात. लहान मुलांना फक्त आई बाबांना convince करायचं एवढेच कष्ट. पण त्यात ती आपुलकी खरंच असेल का? आपल्या पोटच्या पोराला जपायचं तसं किल्ला असायचा. शेवटी हल्ली ते राहिलं नाही. हो मात्र गारवा असतो आणि गंध असतो. कदाचित हाच गारवा आणि गंध जुन्या आठवणींचा असावं, जो वातावरणात दरवळत राहतो आणि काहीतरी , कोणीतरी खूप लांब गेलंय याची कणकण देत राहतो. आपणच लांब गेलोय का ?

Thursday, February 28, 2013

सोनचाफा

         सायंकाळची  ती वेळ असावी. संधिप्रकाश सुद्धा नाहीसा होत होता. क्षितिजावर लालसर आणि गर्द निळ्या रंगांच्या छटा जणू कोण्या  एका चित्रकाराने रेखाटल्या  होत्या. कुठेतरी एखाद्या टेकडीवर असावं. चिमणपाखरांची सुद्धा परतीची वेळ झाली होती. त्यांचा कलकलाट नाही म्हणता येणार, पण जणू आई आपल्या मुलांना  जसं म्हणते," चला खेळणं पुरे झालं, आता शुभंकरोती म्हणायची वेळ झाली आहे" असं वाटत होतं. ती पिले जणू त्यासाठीच आपल्या घराकडे कूच करीत होती. त्या टेकडीवर एक पाऊलवाट असावी, त्यावरूनच मी चालत होतो. त्या वेळेस आजूबाजूला कोणीच न्हवते. अचानक मला एक सुगंध जाणवला. तो सुगंध खूप हवाहवासा आणि परिचित असल्यासारखा वाटत होता. त्या सुगंधाशी माझं काहीतरी गूढ नातं आहे हे जाणवत होतं. काही पावले पुढे चालल्यावर लक्षात आले की तो सुगंध होता सोनचाफ्याचा. तो सुगंध वेगळाच होता. त्या मध्ये हलकासा नशा जाणवत होता.  
           
              रस्त्यावरील दिव्यांनी त्यांचा शेंदरी रंग जणू सर्वत्र उधळला होता. त्या दिवशी पौर्णिमा होती. पुनवेचे चांदणे स्पष्टपणे कळून येत होते. पूर्वेकडे झाडांमधून हलकासा, पिवळसर झालेला चंद्र दिसत होता. त्या वेळेस नक्कीच शरद ऋतू असावा. ते चांदणे शरदाचेच असले पाहिजे. साहजिकच मंद असा गारवा हवेत होताच. गुलाबी थंडीच जणू. कुठेतरी एखादे छोटेसे देऒल देउळ असावे. संध्याकाळच्या आरतीचा घंटानाद अस्पष्टपणे ऐकू येत होता. अगदी प्रसन्न वाटत होते. निर्मनुष्य शांतता होती. रस्त्यावर आजूबाजूला रातराणी देखील बहरली होती. अधून मधून सायली सुद्धा जाणवत होती. त्यांच्यासोबत जाई आणि जुई जणू लपंडाव खेळत असाव्या. संपूर्ण वातावरण वातावरणच सुगंधी होते. वेगळाच असा गोडवा जाणवत होता. जणू सुमन कल्याणपूर मालकंस गात आहेत. वाऱ्याची झुळूक वाहण्याचे आपले काम निमुटपणे करीत होती. त्याचबरोबर झाडांची पाने आपले नृत्य सादर करीत होती. त्या वाऱ्याच्या झुळूकेला साद देत होता तो म्हणजे सोनचाफ्याचा सुगंध. या वातावरणात तल्लीन होऊन पुढे चालतच राहिलो. काही वेळाने रस्त्याच्या बाजूला एक बेंच दिसला, त्यावर बसलो. योगायोगाने त्या बेंचवर, मला माझ्या उजव्या बाजूला एक सोनचाफ्याचे फूल दिसले. मी ते उचलले, आणि त्याचा गंध घेत राहिलो. काही क्षण तल्लीन होऊन सर्व काही विसरून जावे असे वाटत होते. काही क्षणांनी डोळे उघडले तेव्हा त्या फुलाच्या जागी "ती " होती. 
     
               खूप सुंदर दिसत होती "ती", एव्हाना अजूनच सुंदर. खुद्द सुंदरतेला सुद्धा लाजवेल असं ते सौंदर्य वाटत होतं. अगदी निखळ. त्या वेळेस तिने केशरी आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार घातला होता. पांढऱ्या रंगाची ओढणी होती. शरदाच्या त्या चांदण्याशीच जणू तुलना करावी असा तिचा गौरवर्ण. अतिशय नाजूक अशी ती काया. एखाद्या अखंड दुखः सहन करीत असलेल्या व्यक्ती ला सुद्धा काही क्षणांसाठी दुखः विसरायला भाग पाडावे , असे ते स्मित होते. गालावर हलकीशी रक्ताची शीर सुद्धा दिसत होती. गालावर खळी होतिच.कपाळावर मधोमध काळ्या रंगाची एक लहानशी टिकली होती. कानामध्ये लांबसर असे अलंकार होते.  तिच्या काही बटा वाऱ्यासोबत तिच्या चेहऱ्यापर्यंत आल्या होत्या. पुनवेच्या चंद्राला निस्तेज करतील असे ते नयन. एखाद्या गुलाबाच्या कळीला पैज लावून हरवतील असे गुलाबी ओठ होते. ओठांच्या जरासं खाली, हनुवटीवर, उजव्या बाजूला एक तीळ होता. केसांची वेणी तिने खांद्यावरून पुढे आणली होती. गळ्यामध्ये गणपती असलेली एक सोन्याची चेन होती. हातांमध्ये बांगड्या सारखे काही अलंकार होते. अतिशय सुंदर दिसत होती ती. काही काळ फक्त तिलाच न्याहाळत होतो. डोळ्यांची पापणी सुद्धा लवली नसेल. आजूबाजूच्या त्या रम्य वातावरणाचा सुद्धा आता विसर पडत चालला होता. काही वेळाने तिने स्वतःने तिचा हात माझ्या हातात दिला, आणि माझा हात घट्ट पकडला. तिचा आता स्पर्श झाला होता. अचानक मनामध्ये जणू विजांचा कडकडात झाला असावा. तीच वीज सर्वांगातून सणाणून गेली होती. नंतर तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले होते. तिच्या त्या गर्द केसांचा स्पर्श माझ्या गालांना जाणवत होता. त्याच केसामध्ये तिने माळलेला होता तो सोनचाफा. तो सुगंध आता मंत्रमुग्ध करून सोडीत होता. 
          
              नंतर काही काळ असाच गप्पांमध्ये रंगला. सर्व आठवणी अगदी ताज्या करून गेला. सर्व प्रसंग, सर्व संभाषणे, ते भांडणं, ते रुसणं , ते मनवण , ते हसणं ,ते वाट पाहणं, एकत्र खाल्लेली पाणीपुरी, अजून बरेच काही, तशाच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले होते. शेवटी तिने एक प्रश्न विचारला, " मला कधी सोडून तर जाणार नाहीस नं ? " तोच एक प्रश्न शांतता भंग करायला पुरेसा होता. सोनचाफ्याचा सुगंध आता मंदावत चालला होता. शेवटी मी डोळे उघडले. पण तेव्हा "ती" न्हवती. सोनचाफा देखील न्हवता. ते रम्य वातावरण मात्र अबाधित होते. कदाचित तो एक केवळ भास असावा. उरले होते ते फक्त पाणावलेले डोळे. 


Friday, January 27, 2012

पाउलवाट....

              आयुष्य हा एक प्रवासच म्हणावा लागेल. जन्मापासून ते मरण. या प्रवासामध्ये अनेव वाटा, सोबती, अडथळे आणि गमतीजमती येतात. काही वाटा चुकीच्या असतात तर काही बरोबर , काही खडतर तर काही सोप्या, काही लांब तर काही लहान, काही अंतहीन तर काही संपणाऱ्या. जो जी वात निवडेल त्याप्रमाणे त्याचे आयुष्य ठरत असते. त्याचप्रमाणे त्याला अथवा तिला सुख, समाधान, दुख, यश , आणि नशीब लाभते.
             या वाटांवर चालताना आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. काही वेळा त्यांचा रस्ता आणि आपला रस्ता हा एकच असतो. तर कधी काही काळासाठी ते आपल्यासोबत असतात. एखादी व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर असते, तर काही वेळा तसं घडेलच असं नाही. अनेकदा आपली वाट आपल्यालाच चालावी लागते. एखादी व्यक्ती आपल्या प्रवासात आपल्या बरोबर येणे हा पूर्ण नियती चा खेळ असतो. नियती ठरवते  त्या व्यक्ती चे आपल्या प्रवासातील काम, तिचे येणे किंवा जाणे. या सर्व येणाऱ्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जात असते आणि त्या सोबत आठवणी देते. आपण सुधा कधी कधी हेच करत असतो काळात किंवा नकळत. आपण सुधा एखाद्याच्या आयुष्यात येऊन त्याला काहीतरी शिकवून जातो आणि आठवणी देतो. 
             या प्रवासात आपण कधी कधी वाट चुकतो तर कधी कधी चुकीचा सल्ला आपल्याला दुसऱ्या वाटेवर नेऊन पोचवतो. पण सर्वांच्या प्रवासाचे पोहोचण्याचे ठिकाण मात्र एकच असते. प्रत्येकजण आपल्या इच्छापूर्ती आणि सुख या दिशेने जात असतो. पण प्रत्येकाची सुखाची आणि इच्छापूर्ती ची परिभाषा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जन आपल्या स्वतंत्र वाटेवर चालत असतो. वाटेत येणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला दिशादर्शकाचे काम करत असतात. पण प्रत्येक जन हि एक वेगळी वाट सांगत असतो, कारण त्याची सुखाची परिभाषा वेगळी असते. या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याकडे एक नकाशा मात्र आहे. ते म्हणजे आपले मन.
आपले मन आपल्याला अनेकदा दिशा दाखवत असते आपण आपण त्या वाटेवर चालत असतो.
             पण हे मन सुद्धा चंचल आहे, काळानुरूप ते सुद्धा बदलत असते. त्यामुळे काही काळ बरोबर वाटणारी वाट आपल्याला चुकीची वाटू शकते. चुकलेल्या वाटेवर परतीच्या वाटा परत कालच बंद करून टाकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या सुखाच्या परिभाषेत बदल करून पुढे चालावे लागते.
            एक व्यक्ती सांगते " ही वाट चुकीची आहे, तू  खूप आधी रस्ता बदलावा हवा होतास. " पण त्याच वाटेवरील दुसरी व्यक्ती आपल्याला सांगते " तू बरोबर वाट निवडली आहेस. इथेच चालत रहा. " सर्वांचा नकाशा चंचल आहे. एक वाल हि कधीच सारखी राहत नाही. ती नेहमी बदलत असते. सर्वांचा प्रवास अनिश्चित आहे आणि त्याचंह रस्ता हा वर्तमानाशी निगडीत आहे. सुख हि अशी एक गोष्ट आहे कि जी कधीच सध्या करता येत नाही. कोणी तिच्या खूप जवळ जाऊ शकते पण ती कधीच साध्य करता येत नाही. इच्छापूर्ती हे सुद्धा सुखाचेच दुसरे रूप म्हणावे लागेल. त्यामुळे आपण सर्व सुखाचा फक्त पाठलाग करत असतो.
          मग प्रश्न असं पडतो कि "आयुष्य नेमका आहे तरी काय? जर आपल्याला ज्या ठिकाणी जायचा आहे ते ठिकाण कधीच येणार नसेल तर का चालत राहायचं ? " माझ्या मते आयुष्या हे प्रवास आणि पोहोचण्याचे ठिकाण यांचे संमिश्र रूप आहे. या प्रवासातच प्रत्येक क्षणामध्ये सुख लपलेलं आहे. ते वेचत चालत राहायचं. दुःखाच्या मोठ्या पहाडावर सुधा सुखाची एखादी लहान काळी उमललेली असतेच. प्रवास बदलत राहतो आणि आपली ठिकाणे सुद्धा. या प्रवासाचा आनंद  घेत राहणे हीच एक सुखाची सोपी आणि न चुकणारी परिभाषा आहे.
          प्रवासात येणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या कडू गोड आठवणी, त्यांचे अनुभव, येणारे दुखः या सर्व गोष्टींची चव चाखत पुढे चालत राहायचे. वाटेतील प्रेक्षणीय स्थळे डोळ्यात भरून ठेवायची. जेव्हा काल प्रवासाची सांगता करतो तेव्हा मागे वळून पहायचे. तेव्हा आपल्याला दिसतात ते म्हणजे आपल्याच पाउलवाटेवर लांबवर पसरलेले आपल्या पावलांचे ठसे आणि सोबत वेचलेल्या कडू गोड आठवणी. या सर्वांकडे बघून जेव्हा चेहऱ्यावर स्मित खुलते तेच आपले शेवटचे ठिकाण असते. तीच  इच्छापूर्ती असते .